“समाजाची व राष्ट्राची बांधिलकी जोपासून प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे . तरच समाज सुधारून परिवर्तन होईल. आजच्या तरुण-तरुणींच्या खांद्यावर राष्ट्र विकासाची जबाबदारी आहे. ही जबाबदारी त्यांनी लीलया पेलली पाहिजे.तरच समाज व राष्ट्र विकास घडून येईल. आणि आपला भारत देश विश्वात शोभुनी दिसेल .”
रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव हे पोलिस दलातील कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून जनमानसात ख्याती पावत आहेत . त्यांचे १ ली ते तिसरी पर्यंत प्राथमिक शिक्षक अष्टपुत्रे शाळा , सिडको व पुढे लालबहादूर शास्त्री विद्यालय, उदगीर व उच्च माध्यमिक शिक्षण कुसुमताई कॉलेज , नांदेड व शिवाजी कॉलेज उदगीर आणि महाविद्यालयीन शिक्षण उदयगिरी महाविद्यालय , उदगीर येथे झाले. त्यानंतर २०११ साली त्यांनी स्पर्धा परीक्षा देऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले. आणि सन २०१२ ते १५ दरम्यान नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक या पदावर पहिली नियुक्ती झाली. त्या ठिकाणी ते तरुण तडफदार व शौर्याची उमेद घेऊन नक्षलविरोधी कारवायात सहभागी झाले. त्यात ते जखमी झाले होते. त्यांनी दाखवलेल्या शौर्यामुळे पोलिस प्रशासनातील ‘पराक्रम पदक’ देऊन त्यांना गौरविण्यात आले. पुढे त्यांची नियुक्ती औरंगाबाद ग्रामीण विभागात वडोद बाजार , पोलिस स्टेशन औरंगाबाद येथे झाली. त्या ठिकाणी त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सहकार्याने नरबळी प्रकरण उघडकीस आणले होते. पुढे सन २०१९ मध्ये बीड जिल्हा पोलीस विभागात नियुक्ती झाली. तेथे त्यांनी ६ टन गोमांस विक्री जप्त करून कारवाई केली होती. पोलीस प्रशासनतील सर्वोत्कृष्ट कामगिरीमुळे पुढे त्यांना नांदेड जिल्ह्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर बढती मिळाली. अशाप्रकारे या आधीची त्यांची कारकीर्द कौतुकास्पद आणि प्रशंसनीरित्या गाजलेली आहे .
प्रतिक्रिया: –
“माझ्या मुलीने दाखविलेल्या शौर्याची दखल प्रथमत: इन्स्पेक्टर जाधव यांनी घेतली व गावात येऊन तिचा जाहीर सत्कार केला.तसेच माझ्या पत्नीचा व माझ्या कुटुंबाचा सत्कार केला.त्यामुळे आम्ही व समस्त गावकरी आनंदाने भारावून गेलो.लक्ष्मीला व आदित्यला प्रेरणा देऊन आशीर्वाद दिले.त्यांनी असे अनेक चांगले उपक्रम राबवित असल्याने ते मला खरेखुरे ‘सिंघम’ वाटतात.
कु.लक्ष्मीचे वडील – आनंदा येडलेवार, थडीसावळी.
पोलीस दलातील एका वरिष्ठ पदावर रुजू असलेले विजय जाधव शरीराने धिप्पाड, विलक्षण चपळाई व पिळदार शरीर असलेले, कायद्याचे सखोल ज्ञान, शिस्तप्रिय अधिकारी, सर्जनशील व संवेदनशील उपक्रमांचे शिलेदार, व्यसनमुक्तीचे मार्गदर्शक, खिलाडूवृत्तीने व्यायाम क्रिकेट, वाचन, गायन व खेळाचे छंद जोपासणारे, व्यसनमुक्तीचे मार्गदर्शक, कायद्याचे रक्षक म्हणून त्यांचे व्यक्तिमत्व स्तुतिप्रद व वाखाणण्याजोगे आहे.असे अष्टपैलू पोलीस अधिकारी म्हणून रामतीर्थ पोलीस ठाण्याला लाभले असल्याने त्यांची जनमानसात खरेखुरे ‘सिंघम’ म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे .
प्रतिक्रिया :-
“पोलीस प्रशासनात जाधव साहेब यांच्या रुपाने कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय अधिकारी लाभल्याने समाजातील विधायक घडामोडींना चालना मिळत आहे.लोकशाही व राज्यघटना बळकट करण्याचे ते कार्य करीत आहेत.त्यांनी राबवित असलेल्या अनेक नवोपक्रमशील उपक्रमांचे समस्त नागरीकांकडून आम्ही कौतुक करतो व त्यांच्या पुढील भव्यदिव्य वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो .”
सामाजिक कार्यकर्ते – जयरामजी भंडारे , थडीसावळी.
विजय जाधव दिं . २२ आँगष्ट २०२१ रोजी पोलीस ठाणे रामतीर्थ येथे रुजू झाल्यापासून त्यांनी अनेक समाजोपयोगी व राष्ट्रहित जोपासणारे उपक्रम हाती घेऊन ते यशस्वीरीत्या पार पाडत आहेत . आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण ४० गावांचा विस्तारीत असा डोलारा अतिशय शिस्तबद्ध व कायद्याच्या चौकटीत सांभाळत आहेत . त्यातून त्यांनी अवैध वाळू उपसा व चोरटी वाहतूक यावर टाच आणली . त्यामुळे चोरट्या मार्गाने वाळू वाहतूक करणार्यांचे धाबे दणाणले आहेत . वाहनांच्या वाहतुकीच्या संदर्भात शिस्त आणि वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी करण्यात पुढे सरसावत आहेत. निवडणूकीच्या काळात मतदान प्रक्रिया पारदर्शक व निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी ते सदोदित प्रयत्नशील असतात, दारू गुटखा, गांजा असे आरोग्याला घातक असणाऱ्या पदार्थांविषयी जनजागृती करून ‘व्यसनमुक्तीकडे वाटचाल’ करण्याविषयी शाळा-महाविद्यालयांत व्याख्यान देत मार्गदर्शकाची भूमिका पार पाडत आहेत. आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांत सातत्याने पेट्रोलिंग करत असल्यामुळे चोरी, दरोडे, लूटमार, वेठबिगारी, स्त्रियांवरील अन्याय अशा गुन्ह्यांचे प्रमाण कमी होताना दिसत आहे .
भारतीय राष्ट्रीय सणांच्या दिवशी व पारंपरिक सणांच्या दिवशी राष्ट्रीय ऐक्य, धार्मिक समता, सलोखा, एकात्मता आणि बंधुभाव जोपासण्यासाठी नागरिकांचे उद्बोधन करून भारतीय लोकशाही व भारतीय संविधानाची तंतोतंत पालन करून अंमलबजावणी व बळकटीकरण करतानाचे त्यांचे प्रयत्न दिसून येत आहेत . ग्रामीण भागात कौटुंबिक हिंसाचार, जातीय तेढ, सोशल मीडियातील अफवांचे बळी व आर्थिक लूटमार अशा आदी विषयांवर नागरिकांमध्ये नेहमी प्रबोधन करीत असतात. लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ म्हणून भक्कम पाया असणाऱ्या पत्रकार बांधवांचा आदर करून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात नेहमी पुढाकार घेत असतात. दरवर्षी ‘पोलीस रायझिंग डे’ च्या दिवशी विविध कार्यक्रम राबवून पोलीसांबद्दलची आदरयुक्त, सहकार्याची भावना वृद्धिंगत करून पोलीस दलाच्या ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याची सार्थता वास्तवात उतरविण्याचा प्रयत्न करीत असतात. तसेच प्रशासनातील वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करणे व विनम्रतेने संवाद साधणे आणि कार्यालयातील सहकारी कर्मचाऱ्यांशी मनमिळावू व हसत खेळत, ‘एकमेकां साह्य करू | अवघे धरू सुपंथ ||’ या उक्तीप्रमाणे वर्तणूक करीत असतात . ते लहान मुलांशी आपुलकीने व मैत्रीपूर्ण संबंधाने दिलखुलासपणे वागतात .
खेड्यापाड्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये अलौकिक व सामान्य बुद्धिमत्ता- गुणवत्ता असते . यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटीच्या बळावर भारतीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि इतर स्पर्धा परीक्षांचा सखोल अभ्यास करून यशस्वी व्हावे . यासाठी युवा वर्गांना प्रेरणादायी व्याख्यान देऊन मार्गदर्शन करीत असतात . त्यामुळे ते युवा वर्गातील तरुण-तरुणींचे दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणास्थान व आदर्श व्यक्तिमत्व ठरत आहेत . शेतकरी, गोरगरीब, कामगार व पददलित आणि प्रामाणिक वर्गातील लोकांना न्याय मिळवून देण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न असतो. हे त्यांच्या प्रशासकीय कामातील अविभाज्य भाग आहे . महापुरुषांच्या व महान स्त्रियांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या साजरे करून ऐतिहासिक वारसाचे जतन व संवर्धन करून वर्तमान व भविष्यातील पिढीला भारताचा जाज्वल्य इतिहास माहिती करून देण्यात पुढाकार घेत असतात.
अशातच दि. १३ जानेवारी रोजी पोलीस ठाण्यात, स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या स्वाभिमानी राजमाता, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजे आणि प्रतापशाली संभाजीराजे या दोन छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ आणि भारतीय महापुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी केली . यावेळी बालशौर्य पुरस्कार मानकरी कु. लक्ष्मी व तिची माता रेखाबाई यांचा गौरव करून तिच्या मातेचा ‘वीरमाता’ म्हणून सत्कार करुन त्यांना गौरविण्यात आले.
रामतीर्थ पोलिस ठाण्याला अनेक वर्षातून कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय आणि उपक्रमशील अधिकारी लाभल्याने चित्रपटातील आभासी सिंघमपेक्षा समाजातील व प्रशासनातील खरेखुरे *’सिंघम’* म्हणून पोलीस निरीक्षक विजय जाधव साहेब यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy