जगद्गुरु राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे थोडक्यात जीवनपट.
![](https://massmaharashtra.com/wp-content/uploads/2020/09/FB_IMG_1598982844735.jpg)
शब्दांकन- मारोती गंगाधरराव राहिरे अदमपूरकर
शिव संप्रदायाचे प्रमुख मार्गदर्शक, थोर संतपुरुष, वसुंधरारत्न राष्ट्रसंत जगद्गुरु डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर हे अनंतात विलीन झाले म्हणजेच कालवश झाले, ही बातमी जेव्हा समजली तेव्हा मन हे अगदी सुन्न झाले. राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज हे भारतातील वीरशैव समाजासोबतच इतर सर्व बहुजन समाजाचे ते दैवत होते. शिवलिंग शिवाचार्य महाराजांचा जन्म 25 फेब्रुवारी 1917 रोजी झाला. मराठवाडा मधील पहिले एमबीबीएस डॉक्टर म्हणून ते परिचित होते. राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी लाहोर विद्यापीठातून एम.बी.बी.एस.ची डिग्री प्राप्त केली. त्यांनी काही दिवस पठाणकोट मध्ये वैद्यकीय सेवा केली. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक सुद्धा होते. आदरणीय गोळवळकर गुरुजी यांच्यासमवेत त्यांनी पंजाब प्रांतांमध्ये स्वयंसेवकांचे प्रचारक म्हणून काम केले. त्याच बरोबर 1947 मधील भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांचा अतिशय सक्रिय सहभाग होता. स्वातंत्र्य चळवळीमध्ये काम करत असताना त्यांना दोन वेळेस तुरुंगवास सुद्धा झाला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशसेवेचे व जनसेवेचे व्रत घेतलेल्या, जगद्गुरु अप्पाजीनी वीरशैव समाजासोबतच इतर सर्व समाजातील विषमता दूर करण्यासाठी, त्यांच्यामध्ये धार्मिक भावना रुजवण्यासाठी व सामाजिक सलोख्य राखण्याचे ध्येय उराशी बाळगून, जगद्गुरु राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी 1953 मध्ये हिमालयातील कुलुमनाली येथे जाऊन काही काळ योगसाधनेचा तप करून अध्यात्मिक व आयुर्वेदिक ज्ञान प्राप्त केले. व त्यानंतर 1955 मध्ये महाराष्ट्रामधील बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कपिलधार या धार्मिक ठिकाणी अहमदपूर ते कपिलधार पदयात्रेची सुरुवात केली.या पदयात्रेत केवळ लिंगायत समाज बाधव राहत होते असे नाही, तर इतर अन्य भक्त मंडळी राहायची. त्याठिकाणी दरवर्षी श्री क्षेत्र कपिलधार येथे फार मोठी यात्रा आणि उत्सव भरतो. संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील असंख्य भाविक पायी चालत श्री क्षेत्र कपिलधार येथे मन्मथ माऊलीचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी येतात. व तसेच 2001मध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी मन्मथ ज्योत रथयात्रेचे आयोजन केले होते. 2009 साली झालेल्या अखिल भारतीय वीरशैव साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय जगद्गुरु आप्पाजी होते. त्यांनी कुठलाच स्वार्थ न बाळगता, अतिशय निस्वार्थी भावनेतून संपूर्ण आयुष्यभर भारतातील वीरशैव समाजासोबतच व इतर सर्व समाजामध्ये सामाजिक एकात्मता व अध्यात्मिक भक्तीभाव निर्माण करण्यासाठी व सामाजिक विषमतेची दरी दूर करून, व समाजातील अंधश्रद्धा कमी करून, त्यांच्यामध्ये धार्मिक भावना रुजवण्यासाठी व विश्वकल्याणसाठी त्यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आटोकाट प्रयत्न केले.त्यांनी वयाची104 वर्ष जीवन जगले, त्यांची जीवन जगण्याची पध्दती आयुर्वेदिक तत्वाने व उत्तम आहार पध्दती जोपासून हे दीर्घ आयुष्य जगले, सद्याचे जीवन धावपळीचे झाल्याने 100 वर्ष आयु मिळणे कठीण झाले आहे. म्हणून आप्पा च्या जीवन पध्दतीचा प्रत्येकानी आदर्श घेतला पाहिजे. संपूर्ण दक्षिण
भारतातील शिष्यपरिवार त्यांना आवडीने आप्पा असे संबोधत. त्यांचे भारतामधील महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, व कर्नाटक या राज्यांमध्ये फार मोठा शिष्य परिवार आहे. त्यांचे मुख्य भक्तीधाम, मठसंस्थान हे महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील अहमदपुर याठिकाणी आहे. निसर्गावर अनादी काळापासून सर्वसाधारण व्यक्ती असो किंवा थोर महात्मा असो, काही काळ वास्तव्य केल्यानंतर मात्र त्यांना कालवश व्हावं लागतं, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. अप्पाजींच्या कालवश होण्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश व इतर सर्व राज्यातील असलेल्या सर्व शिष्य परिवाराला आपण पोरके झालो व आपलं धार्मिक व अध्यात्मिक छत्र हरवलं असे वाटणे सहाजिकच आहे. परंतु राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज हे वैद्यकीय, आयुर्वेदिक, अध्यात्मिक, भक्तीसंप्रदायाचे अभ्यासक,विज्ञान अभ्यासक, ज्ञान साधना करणारे व मराठी इंग्रजी,तेलगु, कन्नड, हिंदी या भाषेवर प्रभुत्व असणारे अलौकीक व्यक्तिमत्व म्हणजे जगद्गुरु शिवलिंग शिवाचार्य होते. त्यांचे वास्तव्य, व त्यांचा सहवास, व त्यांचा आशीर्वाद कायम आपल्यासोबत राहणार आहे. अप्पाजींच्या सर्व राज्यातील शिष्य बांधवांना व त्यांच्या सर्व चाहत्यांना मला एवढेच कळकळीने नम्र विनंती करायचे आहे की, यापुढे अप्पाजींची सर्वधर्म समभावाची प्रेरणा, सामाजिक सलोख्याची भावना, राष्ट्रीय एकात्मतेची भावना, व धार्मिक सहिष्णुतेचे भावना व जीवनात कोणताही धार्मिक अहंकार न बाळगण्याची शिकवण, निस्वार्थी जगण्याचे मार्गदर्शक तत्व अनुकरण करून, सर्व समाजामध्ये वर्षानुवर्ष सदैव जागृत ठेवून त्यांच्या विचारानुसार आपण आचरण करण्याची शपथ घेतली पाहिजे. मी वरील शब्दांची जी काही मांडणी केली आहे.मी अप्पाजींचा शिष्य नसलो तरी,अप्पाजीचे निस्वार्थी भावनेतून जनकल्याणाचे वृत्त, व त्यांचे विचार मला मनातून आवडत असल्यामुळे आप्पाजी बद्दल मला जो काही थोडाफार अभ्यास आहे ते येथे मी मांडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये काही चूक झाल्यास मी मनापासून सर्वांची माफी मागतो. आदरणीय जगद्गुरु राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज (आप्पाजीना) मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो..
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
-मारोती गंगाधर राहिरे आदमपुरकर( भाजपा सरचिटणीस तालुका बिलोली)