पत्नीच्या हत्येनंतर पतीची आत्महत्या!

(ठाणे प्रतिनिधी – सुशिल मोहिते)

हत्या आणि आत्महत्या अशा दुहेरी घटना ठाण्याच्या श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 16 फेब्रुवारी रोजी रात्री 11 ते 17 फेब्रुवारी सकाळी 10 वाजेपर्यंतच्या कालावधीत घडल्या आहेत. आत्महत्या करणारा पती मृतक आकाश बालाजी समुखराव (29) यांनी आपली पत्नी अश्विनी आकाश समुखराव(19) हिची हत्या प्रथम केल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी दिली.

मृतक अश्विनी आणि मृतक आरोपी आकाश हे रणजित पांडुरंग शिरसाठ यांच्या इंदिरानगर येथील शिवमहिमा चाळीतील खोलीत राहत होते. वेगळे राहण्यावरून या पती-पत्नीत सातत्याने भांडणे होत होती.

दरम्यान या भांडणाला कंटाळलेल्या आकाश याने रागाच्या भरात हातोड्याने पत्नी अश्विनीच्या डोक्यात प्रहार केले. यात अश्विनी मृत पावली. त्यानंतर पश्चातापात मृतक आरोपी पती आकाश याने आपल्याच राहत्या घरात लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेची माहिती 17 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मृतक आरोपीचे वडील बालाजी यांनी श्रीनगर पोलिसांना माहिती दिली. यामुळे वागले परिसरात एकच खळबळ उडाली.

पत्नीची हत्या आणि आरोपीची आत्महत्या केल्याची माहिती मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस उपायुक्त परिमंडळ-5, सहाय्यक पोलीस आयुक्त वागळे इस्टेट, विभाग ठाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही.ए. शिंदे, पोलीस निरीक्षक प्रशासन , पोलीस निरीक्षक गुन्हे शिंदे यांनी भेट दिली.

श्रीनगर पोलीस ठाण्यामध्ये मात्र मृतक आरोपी पती आकाश याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणात कौटुंबिक वादाने प्रकार घडला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. श्रीनगर पोलीस हे अधिक तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या